नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्ताकारण तापलेलं असताना तिकडे दिल्लीत वेगळाच तिढा निर्माण झाला होता. पोलीस विरुद्ध वकील यांची राजधानीत चांगलीच जुंपली आणि चक्क पोलिसांनीच वकिलांविरोधात आंदोलनाचं अस्त्र उगारलं. आपल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यानंतर धरण्याला बसलेले पोलीस अखेर 10 तासांनी कामावर रुजू झाले.
नेमकं काय झालं?
दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात शनिवारी (2 नोव्हेंबर) वकील आणि पोलीस यांच्यात जोरदार हाणामारी झाली. पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. या हाणामारीत 10 हून अधिक पोलीस जखमी झाल्याचा पोलिसांचा दावा आहे, तर 4-5 वकील जखमी झाल्याचं वकिलांच्या संघटनेचं म्हणणं आहे.
वकिलांनी या घटनेच्या निषेधार्थ कनिष्ठ न्यायालयात हरताळ पुकारला होता. वकिलांनी काही न्यायालयात तोडफोडही केली होती. आता या घटनेचा निषेध करत वकिलांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांनी केली आणि आपल्या मागण्यांसाठी धरणे धरले. पोलिसांच्या कुटुंबीयांनी कँडल मार्चही काढला.
तब्बल 10 तास दिल्ली पोलिसांचं हे आंदोलन सुरू होतं. पोलीसच संपावर गेल्यानं राजधानीचं वातावरण ढवळून निघालं. अखेर गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी बैठक बोलावण्यात आली आणि पोलिसांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या.
आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी न्यायिक आयोग करेल. पोलिसांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आणि मगच त्यांनी आंदोलन मागे घेतलं. चौकशीशिवाय आता कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही. शिवाय वकिलांशी झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या पोलिसांना 25000 रुपयांची नुकसान भरपाईसुद्धा देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
या सर्व प्रकरणावर पोलिसांनी धरणे आंदोलन सुरू करताच गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. एका बाजूला पोलिसांशी केलेल्या हाणामारीबद्दल शहा यांनी निषेध केला, त्याच वेळी वकिलांविरोधात पोलिसांनी उगारलेल्या शस्त्रांबद्दलही नाराजी व्यक्त केली.