मुंबई पोलिस दलाची निर्मितीही रंजक आहे. सात बेटांचे संरक्षण करण्यासाठी १६७२पासून रक्षक नेमले गेले. भंडारी ब्रिगेड नावाची ही फौज १७ फेब्रुवारी १७७९ मध्ये अधिक शिस्तबद्ध होत त्यातून मुंबई पोलिस दल निर्माण झाले. महाराष्ट्र पोलिस दल २ जानेवारी १९६१ रोजी स्थापन झाले. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला, तोच पोलिस दलाचा स्थापना दिन. साल 2014 चे महासंचालक संजीव दयाळ यांच्या पुढाकारातून मागील काही वर्षांपासून हा ‘स्थापना दिन’ साजरा केला जातो आहे . तोपर्यंत याचा विसरच पडला होता. विविध पुस्तके, चित्रपट, टीव्ही मालिकांमधून देशातील पोलिस दलाचे बरेवाईट चित्रणही झाले. कधी खऱ्या तर कधी काल्पनिक घटनांवर आधारित कथा सांगितल्या गेल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या अखत्यारीतील पोलिस जनतेवर अन्याय अत्याचार करीत. स्वातंत्र्यानंतर पोलिस दलात बरेच बदल झाले, तरी आजही त्यांच्याबद्दल फारसे कोणी चांगले बोलत नाही. यासंबंधी फ. मुं. शिंदे यांची ‘पोलिस नावाचा माणूस’ ही बोलकी कविता आहे. त्यात पोलिसांची व्यथा त्यांनी मांडली आहे.
अलीकडे कुठलाही इतिहास हा संवेदनशील विषय बनत चालला आहे. वस्तुस्थितीपेक्षा सोयीनुसार त्याकडे पाहिले जाते. त्यामुळे पोलिसांनी लिहिलेला इतिहास सर्वच घटकांना मान्य होईल का, हे आताच सांगणे कठीण आहे. अनेक पोलिस अधिकारी उत्तम लेखक आहेत, ज्युलिओ रिबेरो, किरण बेदी, वाय. पी. सिंह, वाय. सी. पवार, विश्वास नांगरे पाटील अशी अनेकांची पुस्तके गाजली. पोलिसांची चांगली बाजू मांडण्याचा जसा अनेकांचा प्रयत्न आहे, तसेच सुरेश खोपडे यांच्यासारखे बंडखोर लेखकही आहेत की, ज्यांनी यंत्रणेतील त्रुटींवर प्रहार केले. त्यामुळे इतिहास लिहिताना तो केवळ गोडगोड कथांचा न राहता बऱ्यावाईट गोष्टींचा व एकूण वाटचालीचा आढावा घेऊन भविष्यातील पोलिस दलाला दिशादर्शक ठरावा.