मुंबई | बुधवारी राज्यसभा खासदारांनी शपथ घेतली आहे. यावेळी भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी’, अशी घोषणा केली आहे.
उदयनराजे यांच्या या घोषणेवर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अशा घोषणा देऊ नये अशी समज दिली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे राजकारण चांगलेच रंगले आहे.
व्यंकय्या नायडू यांच्या या विधानावर राज्यभरात अनेक संघटना आणि नेत्यांकडून निषेध केला गेला आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांनीही भाजपवर टीका केली आहे. आता याबाबत उदयनराजे यांनी शिवसेनेला चांगलेच खडसावले आहे.
बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पण शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब हा माझा प्रश्न आहे.
शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो वर आहे, यावर आक्षेप का घेतला नाही? असा प्रश्न उदयनराजे यांनी शिवसेनेला विचारला आहे.
तसेच बाळासाहेब मोठे वाटत असतील तर शिवसेनेने ठाकरे सेना असे नाव ठेवावे, असा टोलाही उदयनराजे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
दरम्यान, व्यंकय्या नायडू यांनी राज्यघटनेत नाही त्यावर फक्त आक्षेप घेतला आहे. महाराजांचा अवमान झाला असता तर मी तिथेच राजीनामा दिला, असेही यावेळी उदयनराजे यांनी म्हटले आहे.