मुंबई, 19 सप्टेंबर : महाराष्ट्रचे दिग्गज नेते आणि भाजपचे माजी आमदार सरदार तारा सिंह यांचं निधन झालं आहे. आज सकाळी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. भाजपा नेते किरीट सौमय्या यांनी ट्वीट करून सरदार तारा सिंह यांच्या निधनाची बातमी दिली आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सौमय्या यांनी ट्वीट करत, ‘माझे ज्येष्ठ सहकारी, भाजप नेते सरदार तारासिंह यांचे प्रदीर्घ आजाराने आज सकाळी लिलावती रुग्णालयात निधन झाले.
ईश्वर त्यांच्या आत्मास शांती देवो’ असं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तारा सिंह यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून चिंताजनक होती. इतकंच नाही तर त्यांच्या निधनाच्या अफवाही पसरल्या होत्या. त्यावेळी किरट सौमय्या यांनी ट्वीट करत निधनाची अफवा असल्याचं म्हटलं होतं.